पूर्व हवेली तालुक्यातील उरळी कांचन, लोहगाव, वाघोली, मांजरी, आणि हडपसर या परिसरातील शेतांमध्ये नुकतेच पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महसूल विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे पथके तयार करून पंचनामे सुरू केले आहेत.
शेताच्या ठिकाणी भेट देऊन पीक कितपत खराब झाले आहे, याची पाहणी अधिकारी करत आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे.
पूर्व हवेली तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची विशेष बैठक वाघोली येथे पार पडली. यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
कोलते यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यात आली असून, पिकांचे पंचनामे सध्या सुरू आहेत.”
या बैठकीत तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राममहसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. तहसीलदार कोलते यांनी प्रत्येक गावात शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे वेळेवर व पारदर्शकपणे पूर्ण करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
शासनाकडून मिळणारी मदत योग्य वेळी पोहोचावी, यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने राबवली जात असून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोणकोणत्या पिकांना फटका?
या भागात भाजीपाला, सोयाबीन, मका, ऊस आणि काही ठिकाणी डाळींची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली होती. अवकाळी पावसामुळे या पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, तसेच काही शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पीक पूर्णपणे वाया गेले आहे.
विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी पावसाळी टोमॅटो, भेंडी, कारली यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली होती, त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. टोमॅटोची फळं पाण्यामुळे सडली असून, त्याचा बाजारभावही घसरला आहे. त्यामुळे दुहेरी नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि अपेक्षा
अनेक शेतकरी पंचनाम्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद देत आहेत. मात्र, त्यांना योग्य भरपाई मिळेल का, याबद्दल चिंता आहे. मागील वर्षीही नुकसान भरपाईसाठी अनेकांनी प्रतीक्षा केली होती. त्यामुळे यावेळी पंचनामे वेळेत पूर्ण करून आर्थिक मदत तात्काळ मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
प्रशासनाचा प्रतिसाद
तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीने यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आणि मंडल अधिकारी यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर नुकसानभरपाईचे वितरण सुरू होईल.
सरकारकडून तात्काळ मदतीचे आश्वासन
राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. कृषी विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, खरीप हंगामात पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सूचना दिल्या आहेत.
शासनाच्या ‘महाडीबीटी’ पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच पीक विमा लाभ मिळणार असल्यामुळे, अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.