B:B:F Technology – शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात त्यामध्ये अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी आणि बदलते हवामान अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या राहतात. यामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होतो. यावर उपाय म्हणून कृषी संशोधकांनी Broad Bed Furrow Method (BBF Method) म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धतीची उत्पत्ती केली. कधी जास्त पावसामुळे मुळे कुजतात, तर कधी पाऊस नसल्यामुळे पीक वाळून जाते. पण या सर्व समस्यांवर रुंद वरंबा सरी (BBF) हि पद्धत चांगलं काम करते. हि पद्धत आपण सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर, उडीद, ज्वारी, मूग, बाजरी, वाटाणा या पिकांची पेरणी आपण करू शकतो. हे यंत्र ट्रॅक्टरचलित आहे.
बीबीएफ पद्धतीत ट्रॅक्टरच्या साहाय्याने एकाचवेळी रंधी-वरंबे तयार करा , बियाणे पेरणे आणि खत टाकणे ही तीनही कामे केली जातात. या पद्धतीचा अवलंब विशेषतः कोरडवाहू शेतीत मोठ्या प्रमाणावर होतो, कारण जास्त पावसात पाण्याचा निचरा होतो आणि उन्हाळ्यात जमिनीत ओलावा टिकून राहतो . बीबीएफ पद्धतीमुळे जलसंधारणात २० ते २७ टक्के वाढ होते, तर उत्पादनात सरासरी २५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आहे. तसेच या पद्धतीमुळे मशागत, निंदणी आणि काढणी यांत्रिक पद्धतीने करणे सोपे होते, ज्यामुळे मजुरी खर्च कमी होतो व शेतकऱ्यांचा नफा वाढतो.
रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे –
1) या पद्धतीचा वापर केल्यास, हेक्टरी बियाणे संख्या, बियाणांमधील अंतर, योग्य खोली नियंत्रित राहून बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
2) कमी पावसामध्ये किंवा दुष्काळामध्ये जमिनीमधील ओलावा टिकून राहतो. आणि याच ओलाव्याचा पावसाचा खंड पडल्यास उपयोग होतो.
3) जास्त अंतर असल्यामुळे सर्व पिकांना सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते.
4) योग्य अंतर राखल्यामुळे तण नियंत्रण करता येते.
5) जास्त पाऊस झाल्यास त्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो.
6) या पद्धतीमुळे बियाण्यांची बचत तसेच सोबत खते टाकली जातात. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाचतात.
7) या पद्धतीमुळे पिकांची योग्य उगवण होते, तसेच वाढ आणि उत्पादन व्यवस्थापन सुधारते.
8) योग्य अंतर पद्धतीमुळे फांद्या, फळ, फुलांची जोमदार वाढ होते.
9) मशागतीसाठी जमीन वापरणे सोपे होते त्यामुळे मजुरांचा खर्च आणि वेळही वाचतो.
- कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते आणि शेतकऱ्यांना नफा होतो.
