भारत सरकारने शेतीसाठी महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे – नवीन हवामान अंदाज प्रणाली (Weather Forecast System) सुरू केली आहे. ही प्रणाली विशेषतः शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, त्यातून अचूक हवामान माहिती दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल आणि शेती निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येतील.
हवामानाचा अंदाज आता अधिक अचूक, अधिक स्थानिक आणि अधिक विश्वासार्ह! भारत सरकारने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘भारत फोरकास्ट सिस्टिम’ देशभरात वापरात आणली आहे. या आधुनिक प्रणालीमुळे हवामानाची माहिती थेट गावपातळीवर मिळणार असून, केवळ ६ किलोमीटरच्या परिसरासाठीही सविस्तर अंदाज शक्य होणार आहे. आधी फक्त ४–५ गावांसाठी एकत्रित अंदाज दिला जात असे, पण आता पावसाचे प्रमाण, वादळ, गारपीट, अतिवृष्टी यांचा अचूक आणि त्वरित इशारा मिळणार आहे – तेही वेळेवर! यामुळे शेतकरी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि इतर संबंधित विभाग वेळीच योग्य पावले उचलू शकतील.
रतातील हवामान अंदाज तंत्रज्ञानात एक ऐतिहासिक टप्पा पार! पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) ने विकसित केलेली ‘भारत फोरकास्ट सिस्टिम’ देशाच्या हवामान अंदाज प्रणालीत एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. भारत हा ही प्रणाली विकसित करणारा जगातील पहिला देश ठरला असून, यामुळे हवामान अंदाजाची अचूकता थेट ३०% ते ६७% पर्यंत वाढली आहे.
मॉन्सून ते वादळ – अचूकतेचा नवा मापदंड
या नव्या प्रणालीमुळे मॉन्सूनचा अचूक अंदाज मिळतोय, तर अतिवृष्टी, वादळं, गारपीट यांसारख्या संकटांचा वेळेआधी इशारा देणे शक्य झाले आहे. या तांत्रिक यशामुळे फक्त कृषीच नव्हे तर विमान वाहतूक, संरक्षण, जलमार्ग, पूर व्यवस्थापन आणि आपत्ती नियंत्रण यांसारखी अनेक क्षेत्रं थेट लाभार्थी ठरत आहेत.
शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या प्रणालीचे औपचारिक उद्घाटन करताना सांगितले की, कृषी क्षेत्रासाठी ही प्रणाली फार मोठा वरदहस्त ठरणार आहे. आता शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक हवामान अंदाज मिळेल, त्यामुळे पेरणी, फवारणी, कापणीसाठी योग्य नियोजन करता येईल. यामुळे पिकांचं नुकसान टळेल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
गावपातळीवरील हवामानाचा डेटा – जागतिक पातळीवर मान्यता
या प्रणालीमुळे फक्त काही गावांचा सरासरी अंदाज न देता, थेट प्रत्येक गावासाठी स्वतंत्र हवामान माहिती मिळणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांच्या मते, भारताने हा तांत्रिक टप्पा पार करत जगातील अनेक विकसित देशांपेक्षा पुढे झेप घेतली आहे.
अचूकतेचे आकडे स्पष्ट सांगतात:
- अतिवृष्टीच्या अंदाजात ३०% सुधारणा
- मॉन्सून अंदाज अचूकतेत ६७% पर्यंत वाढ
- वादळांबाबत अधिक प्रभावी आणि त्वरित इशारे
- गावपातळीवर 6 किमी अंतरावर आधारित डेटा प्रणाली
IITM चे संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव यांनी स्पष्ट केलं की ही प्रणाली उष्णकटिबंधीय हवामानासाठी अत्यंत उपयोगी आहे, कारण या भागांमध्ये हवामान बदल अचानक आणि धोकादायक स्वरूपात होतो. त्यामुळे या प्रणालीचा शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाला फार मोठा फायदा होईल.