केळी हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे. विशेषतः करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केळीचे पीक ही मुख्य उत्पन्नाची साधनं आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या वादळवाऱ्यांसह पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये शेकडो एकरवरील केळीचे पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे महिन्याभराचे कष्ट वाया गेले आहेत.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण, शेटफळ, उमरड, वांगी, कंदर, वाशिंबे यांसारख्या गावांमध्ये मागील आठवड्यात आलेल्या वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. त्यानंतर सलग आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी बागांमध्ये पाणी साचून राहिले आहे. परिणामी, पिकाचे मुळे कुजण्याची आणि संपूर्ण पीक हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे महिन्याभराचे परिश्रम आणि गुंतवणूक पाण्यात गेली असल्याचे चित्र दिसत आहे.
केळीच्या बागांना मोठा फटका बसल्याने शेतकरी सरकारकडून तातडीच्या भरपाईची अपेक्षा करत आहेत. मात्र, नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सध्या कृषी सहायकांचा संप सुरू असल्यामुळे ना कोणी शेतात पाहणीसाठी येत आहे, ना पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केळीची लागवड खर्चिक असल्याने शेतकरी भरपाईची रक्कम वाढवावी, अशीही मागणी करत आहेत. शासनाने तात्काळ याची दखल घेऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि योग्य ती मदत द्यावी, ही वेळेची गरज आहे.
सततच्या पावसामुळे शेतजमिनी दलदलीसारख्या बनल्या असून, केळी बागांमध्ये कोणतेही रासायनिक किंवा जैविक उपचार करणे अशक्य झाले आहे. अशा संकटात शेतकरी पूर्णपणे अडकला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असताना, शासकीय यंत्रणांकडून मदतीची ठोस कृती दिसून येत नाही, हे अधिकच चिंताजनक ठरत आहे. कृषी सहाय्यकांचा संप सुरू असल्यामुळे नुकसानाची नोंदणी आणि पंचनामे थांबले आहेत. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याच्या भीतीने अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे, कृषी विभागाचा संप मिटवण्यासाठी तत्काळ प्रयत्न करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.