पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येत्या आषाढी वारीत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यावर भर देत, मागील वर्षीप्रमाणे सुरक्षित, अपघातमुक्त, स्वच्छ व हरित वारी यंदाही सुनिश्चित करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
स्वच्छतेवर भर देताना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, पालखी सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतरही मार्ग स्वच्छ राहावा, यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच, चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ राहील यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. नीरा नदी परिसरातही विशेष स्वच्छता मोहिमा राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले.पालखी पुढे गेल्यानंतर मागील गावांमध्ये तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधांचा पुरवठा सक्षम ठेवावा, यासाठी रुग्णवाहिकांमध्ये आवश्यक प्रमाणात औषधे, तसेच प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित आरोग्य यंत्रणांना दिले. वारी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी, जेणेकरून वारी अधिक हरित आणि पर्यावरणपूरक होईल.
या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध उपाययोजना आखण्याचे आणि सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले.विभागीय पातळीवर आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा, अन्न सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन सेवा यांचे नियोजन वेळेत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. ते विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या नियोजनबद्ध रितीने पार पाडाव्यात, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवत वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांचे विश्वस्त आणि आयोजक यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या सूचना समजून घ्याव्यात आणि त्यानुसार कार्यवाही करावी.तसेच, वारीदरम्यान अन्न शुद्धतेची खात्री होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवावी, असेही ते म्हणाले. याचबरोबर, अन्न भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि व्यापक मोहीम राबवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.डॉ. पुलकुंडवार यांनी राज्यस्तरीय पालखी सोहळा आढावा बैठकीपूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्याचे आदेशही दिले. अनुभवी अधिकारी ज्या जिल्ह्यातून बदली होऊन गेले आहेत, त्यांची सेवा पुन्हा वारी व्यवस्थापनात घेण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.तसेच, सर्व संबंधित विभागांनी पालखी मार्गावर संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर समन्वय राखावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या:
- पालखी मार्ग खड्डेमुक्त ठेवावा, जेणेकरून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील.
- वाहतूक व्यवस्थापन उत्कृष्ट राहील, याची खबरदारी घ्या.
- घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना करा.
- पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करा, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि संवेदनशील भागांमध्ये.
- पुणे, सोलापूर आणि इतर संबंधित तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मार्गावरच्या सर्व सुविधांची व व्यवस्था बाबतची एकत्रित पुस्तिका तयार करा, ज्यामुळे सर्व यंत्रणांमध्ये स्पष्टता आणि समन्वय साधता येईल.
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केलेल्या सादरीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली तयार करण्यात आली असून २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान १ हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलेंडर, स्वच्छता यांसह विविध सुविधा नियोजित केल्या जात आहेत. महिलांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचण्या सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.