वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा : वारीतील वाहनांना टोल माफ, संरक्षण विमा योजनाही जाहीर

वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा : वारीतील वाहनांना टोल माफ, संरक्षण विमा योजनाही जाहीर

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सहुलतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, यंदाच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी समर्पित संरक्षण विमा योजना राबवण्यात येणार असून, वारीतील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल.

यंदाच्या आषाढी वारीत भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत वारीतील अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीतील निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. २९) प्रसारमाध्यमांना दिली.

त्यांच्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे वारी मार्गावर जिथे रस्ते खराब झाले आहेत, तिथे तातडीने मुरूम, खडी टाकून डांबरीकरण करून दुरुस्ती केली जाणार आहे. भाविकांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय, विजेची जोडणी, पालखी तळांवर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय, वारीसाठी निघणाऱ्या वाहनांना यंदाही टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या प्रमुख दिंड्यांसोबत पूर्णवेळ उपलब्ध असलेली सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्याचेही आदेश शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे वारीतील कोणतीही आपत्कालीन स्थिती तत्काळ हाताळता येणार आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी : आयसीयू सुविधा, कार्डियॅक रुग्णवाहिका आणि भव्य आरोग्य शिबिरांची तयारी

यंदाही मागील वर्षीप्रमाणे आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हृदयविकारासारख्या आपत्कालीन परिस्थितींसाठी खास कार्डियॅक रुग्णवाहिका वारी मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, पंढरपूरमध्ये तात्पुरती आयसीयू सुविधा सुरू करून गंभीर रुग्णांवर तत्काळ उपचार शक्य होतील, याची दक्षता घेतली जात आहे.

या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला भेट देऊन थेट पाहणी करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

या घोषणेमुळे यंदाची वारी अधिक सुरक्षित, आरोग्यदृष्ट्या सुसज्ज आणि भाविकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *