राज्यात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे. २ ते ७ जून दरम्यान, जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी “पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम” सुरु होणार आहे. या मोहिमेत गावागावात फिल्ड टेस्ट किटच्या मदतीने पाण्याची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासली जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी सर्व संबंधित विभागांना या उपक्रमाला सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
ही मोहीम गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असून, पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे.
ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग तसेच स्थानिक स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीतून पाच महिलांची निवड करून त्यांना फिल्ड टेस्ट किट (एफटीके) वापरण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिलांच्या मदतीने गावातील नळ पाणीपुरवठा योजना, घरगुती नळजोडणी, शाळा आणि अंगणवाड्यांमधील पाणी स्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणीमध्ये पीएच (अम्लता/क्षारता), क्लोरीन, नायट्रेट्स, फ्लोराईड, क्लोराईड, लोह (आयर्न), अल्कलिनिटी, गढूळपणा (टर्बिडिटी), हार्डनेस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या विविध घटकांचा समावेश आहे. प्राथमिक निकाल त्वरित उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांना त्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत लगेच माहिती मिळेल आणि त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
या मोहिमेदरम्यान एकूण १५७५ गावांमध्ये फिल्ड टेस्ट किट (एफ.टी.के.) वापरून पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांचा समन्वय साधून ही व्यापक आणि प्रभावी जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढेल आणि आरोग्य रक्षणाला मोठा हातभार लागेल.