कृषी विभाग सतर्क! बनावट बियाणे विक्रेत्यांवर मोठी मोहीम राबवली जात आहे

  कृषी विभाग सतर्क! बनावट बियाणे विक्रेत्यांवर मोठी मोहीम राबवली जात आहे

खरीप हंगामाच्या तोंडावर लातूर जिल्ह्यातील शेती सज्जतेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत खरीप हंगामासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विशेष म्हणजे, १ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली का? याचा तपशीलदेखील मंत्र्यांनी यावेळी मागवला. यावरून खरीप हंगामासाठीच्या नियोजनावर ते किती बारकाईने लक्ष ठेवत आहेत, हे स्पष्ट होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खास करून बनावट बियाण्यांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेबाबतही चर्चा झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित व दर्जेदार बियाणे मिळण्यास हातभार लागणार आहे.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सजग असून, खरीप हंगामात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. खरीपपूर्व नियोजन, बियाण्यांचा पुरवठा, वितरण व्यवस्थापन आणि संभाव्य समस्यांवर नियंत्रण यावर भर देण्यात आला आहे.

सध्याच्या मॉन्सूनपूर्व हलक्या सरींमुळे काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली असली, तरी पालकमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे – “घाई करू नका!” मृग नक्षत्रात किमान ८० ते १०० मिमी पावसाचे प्रमाण होईपर्यंत पेरणी थांबवा, असा ठाम सल्ला त्यांनी दिला आहे. कारण योग्य पावसाअभावी बियाण्यांची उगवणक्षमता घटू शकते आणि उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेपूर्वीची पेरणी म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फेरण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाला गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि पिकांचे नुकसान टळेल.

सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घरच्या घरी जतन केलेले, सुकवलेले आणि भिजलेले नसलेले बियाणे वापरावं. पेरणीपूर्वी उगवणक्षमतेची चाचणी आणि बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यामुळे उगम सुधारतो आणि उत्पादनात वाढ होते. योग्य बियाणं निवडणं ही यशस्वी शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पेरणीसाठी रुंद सरी-वरंबा (BBF)” किंवा “टोकण पद्धती”चा वापर केल्यास उत्पादनात २०% पर्यंत वाढ होऊ शकते, अशी माहिती देत कृषी विभागाला ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पद्धतींमुळे पाण्याचा निचरा सुधारतो, मुळांपर्यंत हवा पोचते आणि पीक जोमाने वाढते.

पालकमंत्र्यांनी बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत, असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे अशा प्रकारांना रोखण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *